समाजवादी चळवळीचे खंबीर नेतृत्व हरपले

महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीच्या एक सल्लागार, मार्गदर्शक आणि आघाडी स्थापनेच्या मेळाव्याच्या उद्घाटक राहिलेल्या, ख्यातनाम समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार, समांतर आणि स्वच्छ समाजनिर्मितीच्या राजकारणासाठी देखील भूमिका घेत सतत लढत राहिलेल्या लेखिका प्रा.पुष्पा भावे यांचे काल रात्री १२.३० वा. निधन झाले,हे कळवितांना अतिशय दु:ख होत आहे.
प्रा. पुष्पा भावे (माहेरच्या पुष्पा सरकार; जन्म : २६ मार्च, १९३९) या सुस्पष्ट वैचारिक भूमिका, लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसा, प्रभावी वक्तृत्व आणि त्याला सुसंगत प्रत्यक्ष कृतीची जोड असणाऱ्या समाजवादी नेत्या आणि मराठीतील एक विचारवंत लेखिका समजल्या जातात.
त्या मराठीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक होत्या.

राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पुष्पाताईंचा संपर्क होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पाताई या लाटणे मोर्चात हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात पुष्पाताई अग्रभागी होत्या. स्त्रीवादी चळवळीची पाठराखण करणाऱ्या पुष्पाताईंनी दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या आरंभापासून आहेत. डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये त्या समर्थक राहिल्या. सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणाऱ्या उपक्रमामध्ये पुष्पाताई सतत अग्रभागी असत.
मराठवाडा विद्यापीठ नामांतर, मंडल आयोग अशा प्रश्नांवर झालेल्या चळवळींवर पुष्पाताईंचा वैचारिक ठसा होता. आणीबाणीविरोधात लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या संपूर्ण क्रांती आंदोलनातून जन्माला आलेल्या जनता पक्षाचे पुष्पाताईंनी तडफेने काम केले.

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक निधी, अनुवाद सुविधा केंद्र, भारत-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अ‍ॅण्ड डेमॉक्रसी, मृणाल गोरे साऊथ एशियन सेंटर, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, मानवी हक्कांसाठी काम करणारी मेहेर संस्था अशा विविध संस्था-संघटनांमध्ये पुष्पाताई पदाधिकारी होत्या.

त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने भूमिका घेणाऱ्या लेखिका,विचारवंत, इष्ट समाजाच्या निर्मितीसाठी आयुष्यभर लढत राहण्याचा आदर्श निर्माण केलेल्या , समांतर रंगभूमीला आपलं समीक्षेने प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेल्या समीक्षक,महाराष्ट्राला इष्ट सांस्कृतिक वळण लावणाऱ्या आमच्या मार्गदर्शक गमावला आहे.

महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी आणि विदर्भ साहित्य संघाच्या वतीने त्यांना विनम्र श्रद्धांजली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com