मुंबई – गजबजलेले रस्ते, गजबजलेल्या बस आणि गजबजलेली रेल्वे स्थानके यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबई ओळखली जाते. दररोज धक्काधक्कीचा प्रवास लाखो मुंबईकर करत असतात. दरम्यान मुंबईतील वाढती गर्दी पाहता गर्दीच्या स्थानकांमध्ये आता एकमजली स्टेशन तयार करण्यात येणार असून ९४७ कोटी रुपयांची पुनर्विकास योजना या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आली आहे. त्याचबरोबर हे काम पुढील १६ महिन्यांच्या आत पूर्ण होणार आहे. गर्दीची आणि गजबजलेली मुंबईतील प्रमुख १९ रेल्वे स्थानकांचा या प्रकल्पाअंतर्गत पुर्नविकास केला जाणार आहे. सध्याच्या वाहतुकीला अडथळा न आणता, दिलेल्या जागेत जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकासाठी तपशीलवार आराखडा तयार करून कार्यादेश देण्याचे आवाहन मुंबई रेल्वे विकास महामंडळाने केले आहे. मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प ३A चा एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट लिंक – POS अंतर्गत ९४७ कोटींचा हा पुनर्विकास प्रकल्प आहे.
१९ रेल्वे स्थानकांचा या प्रकल्पाअंतर्गत पुर्नविकास करण्यात येणार आहे. यामध्ये मध्य रेल्वेवरील घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, डोंबिवली, नेरळ, शहाड, कसारा, जीटीबीएन, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या १२ स्थानकांचा समावेश आहे. तर पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, सांताक्रुझ, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई आणि नालासोपारा या सात स्थानकांचा समावेश आहे.